धुळे:- धुळ्याच्या साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे एका कौटुंबिक विवाह निमित्ताने साखरपुडा प्रसंगी कौटंबिक दोन गटात वाद झाल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली. या वादातून धारदार शस्त्राने वार केल्याने तीन जणांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाल्याची देखील माहिती समोर येत आहे.या घटनेत सुरेश गोसावी, देवेंद्र पवार यांचा जागीच मृत्यू झाला असून, साई गोसावी यांचा धुळ्यात खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी गुजरात राज्यातील सोनगड येथील दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. लग्नाच्या पत्रिकेवर नाव छापण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणामुळे लग्नाच्या हॉलमध्ये रक्तरंजित हाणामारी झाली.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हळदीच्या दिवशी साखरपुड्याची तयारी सुरू असताना साक्री व सोनगड येथून आलेल्या नातेवाईकांमध्ये आधीपासूनच वादाची ठिणगी पेटलेली होती. साखरपुड्यापूर्वी काही नातेवाईकांनी व्हॉट्सअपवर आक्षेपार्ह संदेश व व्हिडिओ प्रसारित केल्याने तणाव वाढला होता. त्यातूनच लग्नस्थळी अचानक कुरापत काढून धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे
मृताच्या कुटुंबीयांनी व्हॉट्सअप स्टेटसद्वारे धमक्या दिल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी या प्रकरणात एका संशयिताला ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. दरम्यान, लग्न समारंभाच्या दिवशी किरकोळ कारणावरून झालेल्या रक्तपाताने पिंपळनेरसह संपूर्ण धुळे जिल्हा हादरला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे आणि पुढील कारवाई करत आहेत.












Leave a Reply